पुणे : ‘मी अनेक पुस्तके वाचली. अनेक माणसांना भेटलोही. त्यापैकी काही माणसांच्या सहवासाने माझ्या मनावर दीर्घ काळ टिकणारा ठसा उमटवला. मी वाचलेल्या अनेक पुस्तकांचा माझ्या आयुष्यावर दीर्घ काळ परिणाम झाला आहे आणि सतीशचंद्र सोमणांनी लिहिलेले
‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे पुस्तक त्यापैकीच एक आहे. कोलंबसाने केलेल्या प्रवासावेळीही त्याला अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता; पण असीम धाडसाच्या बळावर त्याने प्रवास केला. त्याचप्रमाणे सतीशचंद्र यांनीही १९९४मध्ये एका इंजिनाच्या विमानाने अमेरिकेतून भारतापर्यंतचा केलेला प्रवास हा प्रचंड धैर्याचं द्योतक आहे. त्यांच्या या प्रवासाच्या रौप्यमहोत्सवी वर्षी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाने मला खूप प्रेरणा दिली. तशीच ती तुम्हालाही मिळेल,’ असा विश्वास ‘सकाळ पेपर्स’चे अध्यक्ष आणि उद्योजक प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.
अमेरिकास्थित खासगी वैमानिक व उद्योजक सतीशचंद्र सोमण यांनी ११ जुलै १९९४ रोजी एका इंजिनाच्या विमानाने अमेरिकेतून दिल्लीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. संपूर्ण अटलांटिक महासागर विमानाने पार करून भारतात पोहोचण्याच्या त्यांच्या या विक्रमाची तेव्हा ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्येही नोंद झाली होती. या पराक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमण यांनी लिहिलेल्या ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील पीवायसी जिमखान्याच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला निवृत एअर मार्शल भूषण गोखले, लेखक सतीशचंद्र सोमण, त्यांच्या पत्नी स्मिता सोमण, बुकगंगा पब्लिकेशन्सचे संस्थापक मंदार जोगळेकर, बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये, रवी नातू आदी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन आणि ‘बुकगंगा’चा प्रवास याविषयी ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी भाष्य केले. ‘अमेरिकेतील एका मराठी साहित्य संमेलनात एका व्यक्तीने भारतातील पुस्तके अमेरिकेत प्रकाशित करण्याबद्दल टोमणा मारला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी कॅलिफोर्नियात लिहिले गेलेले पुस्तक पुण्यामध्ये प्रकाशित करण्याचे ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’चे काम बुकगंगा पब्लिकेशन्स या पुस्तकाच्या निमित्ताने करत आहे. त्यामुळे ‘बुकगंगा’च्या शिरपेचात एका नव्या हिऱ्याची भर पडली आहे, हे आमचे सौभाग्य आहे. मी दहावीनंतर पुण्यात आलो तेव्हा विद्यार्थी सहायक समितीने माझ्यावर अनेक संस्कार केले. त्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलो आहे. त्या वेळी अनेक पुस्तके वाचली; पण ई-बुकची सोय उपलब्ध नव्हती. ‘बुकगंगा’ने साखरप्यासारख्या खेड्यातील मुलींना प्रशिक्षण देऊन ई-बुक तयार केली आहेत. त्यामुळे तरुणांमध्येही वाचनाचे प्रमाण वाढत आहे. सोमण यांचे हे पुस्तक सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यामुळे आम्ही एकाच पुस्तकात मराठी आणि इंग्रजी गोष्ट दिली आहे. मराठी पुस्तक घेणाऱ्याला इंग्रजी पुस्तक मोफत मिळणार आहे. हे ई-बुक अमेरिकेतील मराठी वाचकांसोबतच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांनाही एकाच वेळी वाचता येणार आहे,’ असे जोगळेकर म्हणाले.
सोमण यांच्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सई कुळकर्णी-मुखर्जी यांनी केला आहे. हा अनुवाद करून घेऊन पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांचे मित्र उद्योजक रवी नातू यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कर्नल मोहन काकतीकर, उद्योजिका लीला पूनावाला, उद्योजक रणजित जकली, प्रकाश रत्नपारखी या मित्रांचाही सोमण दाम्पत्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लेखक सतीशचंद्र सोमण म्हणाले, ‘माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला प्रतापराव पवार, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली हा माझा सन्मान आहे. हे पुस्तक मूर्त स्वरूपात आणणाऱ्या रवीचे आभार मानतो. या प्रवासाचे धाडस करताना मला अजिबात भीती वाटली नाही. निश्चयाच्या बळावर मी तो प्रवास पूर्ण केला. एकूण वाटचालीत माझी पत्नी स्मिता हिचीही मोलाची साथ मिळाली. या पुस्तकातून होणारा सर्व नफा मी विद्यार्थी सहायक समितीला देणार आहे.’
रवी नातू म्हणाले, ‘सोमण यांची भावी पिढी अमेरिकेत राहते. त्यामुळे त्यांच्या नातवंडांना आजोबांनी केलेला पराक्रम पुस्तकरूपात वाचता यावा म्हणून या पुस्तकाची निर्मिती झाली. दोन वर्षांच्या प्रयत्नांना आज ‘बुकगंगा’ने मूर्त स्वरूप दिले, म्हणजे माझे कार्य पूर्ण झाले. माझ्या अडचणीच्या प्रसंगी या पुस्तकाने मला प्रेरणा दिली, असे प्रतापराव पवारांनी सांगितले, हे याचे एक वैशिष्ट्य. तशीच ती प्रेरणा यापुढेही सर्वांना मिळत राहो.’
निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, ‘अमेरिकेतून भारतात हवाई मार्गाने अटलांटिक महासागर पार करून येणे हे दिव्यच आहे. सोमण यांचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या वायुदलातील कारकीर्दीत अटलांटिक सागर पार करण्यासाठी वायुसेनेने केलेल्या सर्व प्रयत्नांचे मला स्मरण झाले. खासगी वैमानिक, एका इंजिनाचे विमान आणि तेही १९९४ साली हा प्रवास करणे मनात आणणे हे सगळेच विलक्षण आहे. समुद्रावरून प्रवास करताना सतत सजग राहणे कठीण असते. टाइम झोन बदलल्यामुळे बॉडी क्लॉक बदलते आणि वैमानिकाला झोप येण्याची शक्यता असते. अशा अनेक आव्हानांचा सामना करत सोमण यांनी हा प्रवास पूर्ण केला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अमेरिकेतून उड्डाण करून खासगी विमान भारतात आणण्याचा त्यांचा पराक्रम मोठा आहे. हे पुस्तक सर्वांनाच प्रेरणा देईल.’
विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी आभारप्रदर्शन केले.